लाभ थांबला आहे? लाडकी बहीण योजनेत पुन्हा पैसे येणार… फक्त हे करा!

राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत काही लाभार्थी महिलांना तांत्रिक त्रुटींमुळे मिळणारा आर्थिक लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक पात्र महिलांचे खाते अडचणीत आले आहे. ही अडचण दूर करण्यासाठी आता दुरुस्तीची विशेष संधी देण्यात आली असून संबंधित महिलांनी त्वरित आपल्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

योजनेनुसार लाभार्थी महिला २१ ते ६५ वयोगटातील असावी. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा निवृत्तिवेतनधारक नसावा, ही महत्त्वाची अट आहे. मात्र अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरल्याने अनेक पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या आहेत. अशा प्रकरणांची यादी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी व ग्रामीण) यांच्याकडे प्रत्यक्ष पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहे.

महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेत दरमहा १,५०० रुपये लाभ दिला जातो. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ३६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचे, एकापेक्षा अधिक वेळा लाभ घेतल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे सरकारने पडताळणी आणि दुरुस्ती प्रक्रिया अधिक कडक केली आहे.

Leave a Comment