अकोल्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला आहे. अकोला महानगरपालिकेत भाजपच्या नेतृत्वाखाली तब्बल 44 नगरसेवकांच्या गटाची अमरावती विभागीय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. ‘शहर सुधार समिती’ या नावाने स्थापन झालेल्या या गटामुळे विरोधी पक्षांचे सत्तास्थापनेचे सर्व प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत.
८० सदस्यांच्या सभागृहात बहुमताचा आकडा ४१ असताना भाजपने थेट ४४ नगरसेवकांचे संख्याबळ एकत्र करत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर केला आहे. भाजपाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी गट नोंदणीची अधिकृत माहिती दिली आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील ‘शहर सुधार समिती’मध्ये भाजपचे ३८ नगरसेवक, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ३, अजित पवार गटाचा १, शिंदे गटाच्या शिवसेनेचा १ आणि एका अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे. त्यामुळे भाजपने बहुमतापेक्षा तीन जागांची आघाडी मिळवत सत्तेवर मजबूत पकड निर्माण केली आहे.
दरम्यान, काँग्रेस, ठाकरे गट, एमआयएम आणि वंचित आघाडीने ४२ नगरसेवक सोबत असल्याचा दावा केला होता. मात्र, ही आघाडी आकार घेण्याआधीच भाजपने मोठी राजकीय खेळी करत संपूर्ण समीकरणच उलथवून टाकले आहे.
अकोला महापालिकेतील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, आगामी महापौरपद आणि सत्तावाटपाच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या राजकारणात पुढे आणखी कोणते धक्के बसणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









