महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनाव व निवडणूक चिन्हाचा वाद अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. आज 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावणीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष दिल्लीकडे लागले असून, या निर्णयाचे पडसाद थेट आगामी निवडणुकांच्या रणधुमाळीत उमटण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षनाव आणि चिन्हावरून सुरू झालेला संघर्ष आता न्यायालयीन लढाईत रूपांतरित झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हा एकनाथ शिंदे गटाचा तर राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार गटाचा अधिकृत पक्ष असल्याचा निर्णय दिला होता. मात्र या निर्णयाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटांनी तीव्र विरोध करत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
तीन वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या निकालामुळे केवळ पक्षांचे भवितव्यच नाही तर राज्यातील सत्ता समीकरणे, युती-आघाड्या आणि मतदारांचे राजकीय गणितही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.









