उमरा महावितरणच्या कारभाराविरोधात शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वीजपुरवठ्यातील अनियमितता, रात्रीची शेती सिंचन वेळापत्रकं आणि अभियंत्यांच्या वर्तनावरून नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे शेतातील वीज दिवसा देण्यात यावी. सध्या रात्री वीजपुरवठा सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना अंधारात शेतात जावे लागत आहे. त्यातच उमरा सर्कलमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री पाणी देण्यासाठी जाणे धोकादायक ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
याशिवाय गावातील सतत होणारी वीज खंडितता तात्काळ थांबवावी, अशीही ठोस मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील घरगुती ग्राहक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे.
महावितरणच्या संबंधित अभियंत्यांकडून तक्रारदार शेतकऱ्यांशी अपमानास्पद आणि धमकीच्या भाषेत वागणूक दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “तक्रार केली तरी फरक पडत नाही” अशा वक्तव्यांमुळे संताप आणखी वाढला आहे. त्यामुळे संबंधित अभियंत्याची तात्काळ बदली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, भविष्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कोणत्याही शेतकऱ्याच्या जीवितास हानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांची राहील, असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. उमरा सर्कलमधील ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.









