माणुसकीला काळीमा; नवजात बालक विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी स्वप्नील सुरवाडे आईच्या कुशीत असायला हवं होतं…पण नियतीने त्या चिमुकल्या जीवासाठी अंधाराची विहीर निवडली.पातूर तालुक्यातील ग्राम माझोळ येथे नवजात बालकाला निर्दयपणे विहिरीत फेकल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली असून, माणुसकी कुठे हरवली? असा प्रश्न पुन्हा एकदा समाजासमोर उभा ठाकला आहे

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्राम माझोळ येथे मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री एका नवजात बालकाला थेट विहिरीत टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

आज सकाळी गावातील काही नागरिकांना विहिरीत काहीतरी संशयास्पद दिसून आल्यानंतर त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता विहिरीत नवजात बालक असल्याचे लक्षात आले. तत्काळ ग्रामस्थांनी पातूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पातूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि विहिरीतून नवजात बालक बाहेर काढण्यात आले.

पोलिसांनी पुढील कार्यवाही करत सदर बालकाचा मृतदेह अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (पीएम) पाठवला आहे. या नवजात बालकाचे आई-वडील कोण आहेत, तसेच बालकाला विहिरीत का टाकण्यात आले, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

या अमानुष घटनेमागे नेमका कोण आहे, सामाजिक दबाव, भीती की इतर काही कारणे आहेत का, याचा तपास पातूर पोलीस करत असून परिसरातील हालचाली, संभाव्य संशयित आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे तपासाला वेग देण्यात आला आहे.

नवजात बालकाच्या हत्येसारख्या गंभीर घटनेमुळे समाजात हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Comment