अकोला | प्रतिनिधी:- अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार गाव रविवारी सायंकाळी गोळीबाराच्या थरारक घटनेने हादरून गेला. शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या वापरावरून सुरू असलेल्या जुन्या वादाचे अखेर रक्तरंजित रूपांतर झाले. या घटनेत अमोल गजानन मालोकार या तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी चार विशेष पथके तैनात केली आहेत.
रविवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास निंबी मालोकार येथील शेतशिवारात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, अमोल मालोकार यांच्यावर तब्बल सहा राऊंड गोळीबार करण्यात आला. त्यापैकी तीन गोळ्या शरीराला लागल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दोन गोळ्या पाठीच्या भागात, तर एक गोळी कानाच्या खाली लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबाराची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. घटनास्थळावरून काडतुसे, गोळ्यांचे निशाण तसेच अन्य भौतिक आणि बॅलेस्टिक पुरावे गोळा करण्यात येत असून संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, मृत अमोल मालोकार यांच्या नातेवाईकांनी अजय मालोकार या चुलत भावावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. शेतरस्त्याच्या वादातूनच हा हल्ला झाल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, या आरोपाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गोळीबारानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्या शोधासाठी चार स्वतंत्र पोलीस पथके तयार करण्यात आली असून संभाव्य ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. बाळापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गोळीबारात नेमके कोणते शस्त्र वापरण्यात आले, प्रत्यक्षात किती गोळ्या झाडण्यात आल्या आणि हत्येमागील खरे कारण काय, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
शेतरस्ता आणि मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असला, तरी तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे. साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक अहवाल आणि बॅलेस्टिक तपासणीच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अकोला जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतरस्त्यांच्या वादाचे वाढते गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.






Leave a Comment