अकोट तालुक्यातील कुटासा गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चक्क कुत्र्यांचा वावर होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेचा आणि गावकऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कुटासा गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर गावातील कुत्रे फिरत असल्याने या ठिकाणच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच टाकीतून गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत असल्याने टाकीची स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे अत्यंत गरजेचे आहे.
पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर कुत्र्यांचा वावर होत असतानाही पाणीपुरवठा विभाग तसेच गावातील पाणीपुरवठा विभागाचे संबंधित कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याचा सवाल उपस्थित होत आहे. पिण्याचे पाणी थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
पाणीपुरवठा विभागाने तातडीने लक्ष देऊन पाण्याच्या टाकीची स्वच्छता करावी, तसेच टाकीवर कुत्र्यांचा वावर होणार नाही यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
पिण्याच्या पाण्याच्या टाकीची अशी अवस्था कायम राहिल्यास गावकऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभाग आता तरी जागा होणार का, असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.






Leave a Comment