Ads

५०० कुटुंबांचे गाव… पण आता फक्त एकच घर! मेळघाटातील ‘पिली’ची थक्क करणारी कहाणी

By Nilesh Sir

August 2, 2026 12:18 pm

Ads

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिदुर्गम भागात वसलेले ‘पिली’ हे गाव आज एका अनोख्या वास्तवामुळे चर्चेत आले आहे. एकेकाळी सुमारे ५०० कुटुंबांनी गजबजलेले हे गाव, पुनर्वसनानंतर पूर्णपणे ओसाड झाले आहे. मात्र या संपूर्ण गावात आजही भोगीलाल बैठेकर यांचे एकमेव कुटुंब वास्तव्यास असून, गावात केवळ ७ मतदार शिल्लक आहेत.

मेळघाटातील वाघांचे संवर्धन आणि जंगलाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने २०२१ मध्ये गावाचे पुनर्वसन करण्यात आले. बहुतेक ग्रामस्थांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेत नवीन ठिकाणी स्थलांतर केले. मात्र कायद्यानुसार कोणालाही जबरदस्तीने गाव सोडण्यास भाग पाडता येत नसल्याने भोगीलाल बैठेकर यांच्या कुटुंबाने आपल्या पिढीजात भूमीतच राहण्याचा निर्णय घेतला.

आज पिली गावात एकाच घरातून जीवन सुरू आहे. घनदाट जंगल, दिवसभर किड्यांचा किरकिर आवाज, अधूनमधून लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज आणि बाकी सर्वत्र शांतता… अशी या गावाची सध्याची ओळख बनली आहे. उंच डोंगरावरचे मंदिर, पण त्यात देवाची मूर्ती नाही; भलीमोठी पाण्याची टाकी, पण त्यात पाणी नाही. गावातील रिकामी घरे आणि ओस पडलेले रस्ते पुनर्वसनाची साक्ष देताना दिसतात.

या गावाच्या दुर्गमतेचा अंदाज यावरून येतो की, अवघ्या ७ मतदारांसाठी निवडणूक आयोगाला ८ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक मतदानासाठी येथे पाठवावे लागते. लोकशाहीच्या दृष्टीने हे गाव आजही तितकेच महत्त्वाचे मानले जाते.

पिली गावाजवळ १८व्या शतकातील ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील मैलाचा दगड आजही उभा आहे. अपूर्ण राहिलेल्या जुन्या रस्त्याची साक्ष देणारा हा ऐतिहासिक अवशेष इतिहासाची आठवण करून देतो.

भोगीलाल बैठेकर सांगतात की, पुनर्वसनावेळी शासनाकडून दहा लाख रुपयांची मदत मिळाली. त्या पैशातून त्यांनी सुमारे २५ एकर शेती, मोठे घर, गाई आणि कोंबड्यांसह स्थिर संसार उभा केला. मुलाचे लग्न झाले असून तोही पत्नीसह त्यांच्यासोबत राहतो. दोन नातवंडे जवळच्या गावातील शाळेत शिकतात आणि त्यांना दुचाकीवरून शाळेत नेले जाते.

मात्र बैठेकर यांचा सवाल कायम आहे—”सरकार फक्त दहा लाख रुपये देते. आजच्या काळात दहा लाख रुपयांत काय होणार?”

मेळघाटातील पिली हे गाव आज केवळ एक भौगोलिक ठिकाण नाही, तर जंगल संवर्धन, पुनर्वसन, लोकशाही आणि माणसाच्या मातीतल्या नात्याची एक वेगळी कहाणी बनले आहे. येथे उरलेले एकमेव घर आणि त्या घरातील जीवन, मेळघाटाच्या इतिहासातील एक अनोखे पान जपून ठेवत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!