अकोट | प्रतिनिधी : अकोट तालुक्यातील वरूर जऊळका येथे श्री हनुमंत राया मंदिरातील चांदीचा मुकुट चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिर चोरीच्या सलग घटनांमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून, मंदिरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरूर जऊळका येथील श्री हनुमंत राया मंदिरातून रात्री सुमारास चांदीचा मुकुट चोरीला गेला. अंदाजे अर्धा किलो वजनाचा हा चांदीचा मुकुट असून, त्याची किंमत सुमारे १ ते १.५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
भुरट्या चोरट्यांनी मंदिरातील हा मौल्यवान मुकुट लंपास केल्याची घटना भाविक आणि गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. श्रद्धास्थान असलेल्या मंदिरातच चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
मंदिर चोरीच्या घटनांची मालिका?
यापूर्वी देवरी येथील महादेव मंदिरात चोरी, त्यानंतर चंडिकापूर येथील मंदिर चोरीची घटना समोर आली होती. आता अकोट तालुक्यातील वरूर जऊळका येथील हनुमंत मंदिरातील चांदीचा मुकुट चोरीला गेल्याने मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मंदिरांसारख्या श्रद्धास्थानांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने गावातील सुरक्षा व्यवस्था आणि रात्रीच्या गस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या चोरीप्रकरणी दहीहंडा पोलीस पुढील तपास करीत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.







Leave a Comment