नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणूक 2025 नंतर अकोटच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ध्येय-धोरणांना छेद देत AIMIM सोबत युती केल्याचा ठपका ठेवत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी संबंधित पदाधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे अकोटसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, अकोट नगरपरिषदेत AIMIM सोबत युती करून भाजपच्या धोरणांना ‘सुरंग’ लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही युती करताना पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना किंवा संघटनात्मक पातळीवर विश्वासात घेण्यात आले नाही. या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा गंभीर आरोपही नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

“अशी कृती ही पक्षशिस्तीला धरून नाही. त्यामुळे आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत तातडीने खुलासा करावा,” असा थेट इशारा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे. या नोटीसमुळे संबंधित नेत्याची अडचण वाढली असून, पक्षांतर्गत कारवाई अटळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे भाजपच्या शिस्तबद्ध संघटनात्मक भूमिकेचा पुनरुच्चार झाल्याचेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता संबंधित पदाधिकारी काय खुलासा करतात आणि पक्ष नेतृत्व पुढे काय निर्णय घेते, याकडे अकोटसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.









