शेतात राबराब राबून उभं केलेलं पीक… त्यातून घर-संसाराचा गाडा चालवण्याचं स्वप्न… पण हेच जिवंत पीक अनोळखी इसमास कापून टाकल्याने शेतकऱ्याच्या कष्टावर अक्षरशः घाला घातला गेला आहे! अकोट तालुक्यातील ठोकबर्डी शिवारात तब्बल दोन एकरातील जिवंत कपाशीचे पीक कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पावसाच्या खंडामुळे आधीच शेतकरी संकटात आहे. पावसाची प्रतीक्षा, पिकाची चिंता आणि वाढता शेतीखर्च अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या उभ्या पिकाकडे आशेने पाहत असताना, ठोकबर्डी शिवारातील या प्रकाराने त्या आशेवरच पाणी फेरल्याचे चित्र आहे.
शेतात गेले अन् पायाखालची जमीनच सरकली!
बाळू धनराज तरोळे आणि नंदू धनराज तरोळे यांच्या शेतातील कपाशीचे जिवंत पीक कापून टाकल्याचा आरोप आहे. दररोजप्रमाणे सकाळी नंदू तरोळे शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना शेतातील कपाशीचे पीक कापून टाकल्याचे निदर्शनास आले. डोळ्यांसमोर उभं असलेलं पीक अशा अवस्थेत पाहून शेतकऱ्याला मोठा धक्का बसला. मेहनतीने वाढवलेलं पीक कोणीतरी कापून टाकल्याने या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

नुकसान झालं, आता भरपाईची मागणी
कपाशीचे जिवंत पीक कापून टाकल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्याच्या कष्टाने उभ्या राहिलेल्या पिकाची अशी नासधूस नेमकी का करण्यात आली? या प्रकारामागे नेमकं कारण काय? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मात्र, या प्रश्नांची निश्चित उत्तरे पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत.

पोलिसांत धाव; चौघांविरुद्ध तक्रार
घटना समोर आल्यानंतर नंदू तरोळे यांनी तत्काळ दहीहांडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.
तक्रारीनुसार,
- पुरुषोत्तम जानराव चेचरे, रा. ठोकबर्डी, ता. अकोट, जि. अकोला
- गजानन रामरतन मुकींन, रा. हिंगणी बु., ता. अकोला, जि. अकोला
- कैलास जानराव चेचरे, रा. ठोकबर्डी, ता. अकोट, जि. अकोला
- एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय मिळणार का?
पावसाच्या खंडाने आधीच शेतीचे गणित बिघडलेले असताना, उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने संबंधित शेतकऱ्यांसमोर आणखी मोठे संकट उभे राहिले आहे.
आता या प्रकरणातील सत्य काय, जिवंत कपाशीचे पीक नेमके कोणी आणि कोणत्या कारणातून कापले, तसेच शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची भरपाई कशी मिळणार, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.






Leave a Comment