अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अकोट तालुका प्रतिनिधी गणेश बुटे:–अकोट शहरातील भीमनगर परिसरात सुरक्षा कठडे नसलेल्या पुलामुळे सोमवारी दुपारी मोठा अपघात घडला. पत्नी आणि मुलासह दुचाकीवरून जाणारे संजय शंकरपाळे यांचे वाहन अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली; मात्र संजय शंकरपाळे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर अकोट नगरपालिकेच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

खानापूर वेस भागातील रहिवासी संजय शंकरपाळे हे पत्नी रंजिता आणि मुलगा विराट यांच्यासह भीमनगर परिसरातील पुलावरून जात होते. पुलाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा कठडे नसल्याने दुचाकीचा ताबा सुटला आणि काही क्षणांतच तिघेही नाल्यात कोसळले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
कठडे नसलेला पूल म्हणजे अपघाताला थेट निमंत्रण!
शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुलावर सुरक्षा कठडे नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही उपाययोजना होत नसतील, तर प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. पुलावर तातडीने बॅरिकेडिंग करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
२४ तासांत तात्पुरते बॅरिकेड्स आणि त्यानंतर कायमस्वरूपी सुरक्षा कठडे उभारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू राहिल्यास नगरपरिषदेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर तरी अकोट नगरपालिका प्रशासन जागे होणार का? की आणखी एखाद्या दुर्घटनेनंतरच सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जाणार? असा सवाल आता अकोटकरांकडून उपस्थित होत आहे.






Leave a Comment