राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात ये-जा, शेतीकामे आणि शेतमाल वाहतूक सुलभ व्हावी यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत अधिकृत निवेदन केले.
शेत पाणंद रस्त्यांची वाढती गरज, मनरेगा अंतर्गत कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. वाढते शेती यांत्रिकीकरण आणि आधुनिक शेतीपद्धती लक्षात घेता, ही योजना महसूल विभागामार्फत पूर्णतः यंत्रसामग्रीच्या सहाय्याने राबविण्यात येणार असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर रोजगार हमी योजना विभागाची ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ पूर्ववत सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर कोणताही परिणाम होणार नाही.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
या योजनेचा मुख्य उद्देश बारमाही आणि मजबूत शेतरस्त्यांचे बांधकाम करून पेरणी, मशागत, कापणी तसेच शेतमाल वाहतुकीस गती देणे हा आहे.
गाव नकाशांवर दर्शविण्यात आलेल्या शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटविली जाणार आहेत. रस्ते बांधणीसाठी लागणाऱ्या गाळ, माती, मुरुम आणि दगडावर कोणतेही रॉयल्टी शुल्क आकारले जाणार नाही.
तसेच रस्त्यासाठी आवश्यक असलेले तातडीचे मोजणी शुल्क आणि पोलीस बंदोबस्त शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे.
या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडून अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय सीएसआर निधीमधूनही निधी स्वीकारण्याची तरतूद असून, त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नावे स्वतंत्र खाते उघडण्यात येणार आहे.
कशी होणार अंमलबजावणी
योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी बहुस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यस्तरावर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा क्षेत्रस्तरावर स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या कार्यरत राहणार आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतात ये-जा सुलभ होणार असून, बाजारपेठेशी संपर्क अधिक मजबूत होईल. परिणामी ग्रामीण भागातील शेतीव्यवस्थेला मोठा आधार मिळणार असून, शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.





