अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : करोनामुळे २०२१ मध्ये होऊ न शकलेली जनगणना आता डिजिटल पद्धतीने होणार आहे. २०२६-२७ या काळात दोन टप्प्यांत ही प्रक्रिया पार पडेल. यावेळी जातीसह सर्व माहिती नोंदवली जाणार असून, देशभरातील सुमारे ३४ लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांना मोबाईल अॅप देण्यात येईल आणि त्यावर थेट माहिती भरली जाईल. ही माहिती केंद्रीय सर्व्हरवर पाठवली जाईल.
दोन टप्प्यांतील कामकाज
पहिल्या टप्प्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान घरांची माहिती गोळा केली जाईल. घराची अवस्था, सुविधा आणि मालमत्तेची नोंद केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात, फेब्रुवारी २०२७ पासून प्रत्यक्ष व्यक्तींची माहिती घेतली जाईल. मात्र लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे सप्टेंबर २०२६ मध्येच हे काम केले जाईल.
स्वयंगणनेची सुविधा
यंदा पहिल्यांदाच नागरिकांना स्वयंगणनेची सोय देण्यात आली आहे. यात लोक स्वतःच अधिकृत संकेतस्थळावर आपली माहिती भरू शकतात. त्यामुळे जनगणना कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
जिओ-टॅगिंगची नवी अंमलबजावणी
प्रत्येक इमारतीला आता जिओ-टॅग केलं जाणार आहे. यासाठी डिजिटल लेआउट मॅपिंग (DLM) आणि हाऊसलिस्टिंग ब्लॉक्स (HLB) चा वापर केला जाईल. या पद्धतीमुळे जनगणनेची माहिती अधिक अचूक आणि पारदर्शक राहील.
