अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: सिलिकॉन व्हॅलीतील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ‘क्लेनर पर्किन्स’चे सह-संस्थापक विनोद खोसला यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) भविष्यातील नोकऱ्या आणि शिक्षणव्यवस्थेवर कसा प्रभाव टाकेल, याबाबत गंभीर इशारा दिला आहे. ‘WTF’ पॉडकास्टमध्ये निखिल कामथ यांच्याशी बोलताना त्यांनी सध्याच्या शिक्षण आणि रोजगाराच्या चौकटी पूर्णपणे बदलणार असल्याचं स्पष्ट केलं.
पाच वर्षांत ८०% नोकऱ्या एआयद्वारे नष्ट होणार
खोसला म्हणाले, “पुढील पाच वर्षांत मानवी हातून सध्या केल्या जाणाऱ्या ८० टक्के नोकऱ्या एआय घेईल. कायदा, आरोग्यसेवा, बँकिंग यांसारख्या क्षेत्रांत हे बदल दिसून येतील.” मात्र, ते म्हणाले की याच काळात नव्या आणि कल्पनेपलिकडच्या संधीही तयार होतील. २०४० पर्यंत नोकरी केवळ छंद म्हणून केली जाईल, अशी खोसलांची भाकिते आहेत.
“आजची पारंपरिक महाविद्यालयीन पदवी लवकरच उपयोगी राहणार नाही,” असं सांगून खोसला यांनी एआय शिक्षकांविषयी स्पष्ट केले की, “हे एआय आधारित शिक्षक सर्वोत्तम मानवी शिक्षकांपेक्षा अधिक प्रभावी ठरतील. २४ तास, वैयक्तिक गरजेनुसार शिक्षण देणाऱ्या प्रणालीमुळे वर्ग, इमारती, ट्युटर्स यांची गरजच उरणार नाही.” त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाकडे सकारात्मकपणे पाहून स्वतःला एआयसह समजून घेणं गरजेचं असल्याचे संकेत त्यांनी दिले.