अकोला न्यूज नेटवर्क
जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अनेकदा टीका करत गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर, आता भाजप आमदारांनी जळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ खडसे यांच्या चारित्र्यावर थेट प्रश्नचिन्ह
मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे यांना थेट सवाल विचारला. ते म्हणाले, “माझा आपल्याला सवाल आहे आणि माझं आपल्याला सांगणं आहे. तुमच्याच मतदारसंघातील एका व्यक्तीने मला काही गोष्टी सांगितल्या, त्याची जर मी जाहीर वाचता केली, तर आपल्याला बाहेर तोंड काढायला जागा राहणार नाही.” चव्हाण यांनी त्या व्यक्तीला खडसे यांच्यासमोर जाहीर पत्रकार परिषदेत आणण्याची तयारीही दर्शवली. त्या व्यक्तीने सांगितले की, “एकनाथ खडसे हे अतिशय खालच्या स्तराचा विचार करणारे नेते आहेत. मी त्यांना अतिशय जवळून पाहतो. वीस वर्षांच्या यांच्या इतिहासात यांनी अनेक लोकांना संपवले. जवळच्या लोकांना यांनी संपवले.”
चव्हाण यांनी पुढे म्हटले की, “यांनी राजकारणात तर हे केलेच, परंतु यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवले. मी हे जबाबदारीने तुम्हाला सांगतो आहे. जसं तुम्ही लोढाचं सांगितलं, लोढाने तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ते आरोप करत आहात, तुमच्याविरोधात देखील मला अशाच काही लोकांनी येऊन सांगितलं आहे, की एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते. त्या महिला रात्र-रात्र यांच्याकडे येऊ राहायच्या, सकाळी लोकं त्यांना सोडायला जायचे, असा बघणारा व्यक्ती सांगत होता,” असे मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे. हे आरोप एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
जाहीर आव्हान आणि इशारा
दरम्यान, मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना जाहीर आव्हानही दिले आहे. ते म्हणाले की, “मी मुक्ताईनगरमध्ये येतो, जाहीरपणे दोघे पत्रकार परिषद घेऊन एकमेकांसमोर येऊन बोलू. गिरीश महाजन यांच्यापेक्षा मी विकासाच्या बाबतीत सरस आहे, असं जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं, तर मी तुमचा सत्कार करायला मुक्ताईनगरमध्ये येईल.” हे आव्हान म्हणजे या दोन्ही नेत्यांमधील वाद अधिक वैयक्तिक स्तरावर पोहोचल्याचे संकेत देते.
यापुढे जर एकनाथ खडसे यांनी वारंवार चुकीचे वक्तव्य करून पक्षाची प्रतिमा आणि नेत्यांची प्रतिमा खराब करत असाल, तर त्यांना त्याच्यापेक्षा डबल उत्तर मिळेल, असा इशाराही यावेळी आमदार चव्हाण यांनी खडसे यांना दिला आहे. या आरोपांमुळे जळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे, कारण हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत आणि त्याचा परिणाम खडसे यांच्या राजकीय प्रतिमेवर होण्याची शक्यता आहे.