अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली| भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) आपल्या ‘भारत गौरव यात्रा’ टूर पॅकेजसाठी EMI अर्थात हप्त्याने तिकीट भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता तिकीटाची पूर्ण रक्कम एकरकमी भरण्याची गरज नसून, प्रवास केल्यानंतरही त्या रकमेचा हप्ता भरता येणार आहे.
ही सुविधा सर्वसामान्य प्रवाशांकरता दिलासा देणारी असून भारत गौरव ट्रेनने धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी निघणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. भारत गौरव यात्रेसाठी अनेक टूर पॅकेज सादर करण्यात आले आहेत. 13 ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित टूरसाठी इकोनॉमी श्रेणीचे भाडे 18,460 रुपये, थर्ड एसीसाठी 30,480 रुपये आणि कम्फर्ट क्लाससाठी 40,300 रुपये निश्चित करण्यात आले आहे. ही रक्कम आता हप्त्यांमध्ये भरता येईल.
IRCTC ने EMI सोयीसाठी काही खासगी आणि शासकीय बँकांशी करार केला आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या प्रवाशांना तिकीट बुक करतानाच EMI चा पर्याय निवडता येईल. बुकिंग “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर केले जाईल. हे पॅकेज निवडणाऱ्या प्रवाशांना ट्रेनमधील तिकीट, प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये थांबण्याचा खर्च, जेवण व दर्शन अशा विविध सुविधा उपलब्ध असतील.
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या भावात देशातील धार्मिक स्थळांचे दर्शन घडवून आणणारी ‘भारत गौरव यात्रा’ ही योजना IRCTC मार्फत सादर करण्यात आली आहे. ही सेवा केवळ भारत गौरव ट्रेनसाठीच असून, इतर रेल्वे गाड्यांकरता EMI सुविधा सध्या लागू नाही. तथापि, भविष्यात ही सोय विस्तृत स्वरूपात लागू केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रेल्वेच्या या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून, धार्मिक यात्रेच्या योजनांमध्ये आर्थिक दृष्ट्या सवलत मिळाल्याने अधिक प्रवासी या सेवेकडे वळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.