अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | अपघातप्रवण स्थळांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबरोबरच वाहतुकीत शिस्त आणावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत तिस-या मजल्यावरील सभागृहात श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांच्यासह अनेक यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यात ४८ अपघातप्रवण स्थळे आहेत. ही संख्या शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना राबवा. त्याचप्रमाणे, वाहतुकीत शिस्त आणणे अत्यावश्यक आहे. अपघातप्रवण स्थळांच्या ठिकाणी वाहनांचा वेग मर्यादित राहावा. अनेक नागरिक उड्डाणपुलावर विरूद्ध दिशेने येतात. त्यामुळे अपघात संभवतात. अशा ठिकाणी बॅरियर किंवा योग्य उपाय राबवा. शहरातील ‘ट्रॅफिक सिग्नल’च्या ठिकाणी टायमर बसवा.
लक्झरी बस अनेकदा नियोजित ठिकाणी न थांबता शहरात कुठेही रस्त्यावर उभ्या दिसतात. अवैध पार्कींग, नियोजित पार्कींग स्थानाव्यतिरिक्त केलेले पार्कींग यामुळे रहदारीला अडथळे निर्माण होत असतात.अशी कुठेही बस पार्क होऊ नये. बसमालकांची बैठक घेऊन याविषयी सूचना द्यावी. शहरातील अंडरपासमध्ये पाणी तुंबू नये म्हणून महामार्ग प्राधिकरणाने तातडीने व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले.