अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो
अकोला : अकोला शहरात रस्त्यांवर मनमानीपणे रिक्षा थांबवून वाहतूक अडवणाऱ्या चालकांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. RTO आणि वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा पाहता, बेशिस्त रिक्षाचालकांवर शिस्त कधी बसेल, हा प्रश्न ऐरणीवर आहे. सावरी दिसली की मागचा पुढचा विचार न करता हे ऑटो चालक आपला ऑटो तिथेच थांबवत असल्याने इतर वाहन चालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
गांधी चौक, रेल्वे स्टेशन, बसस्टँड परिसरात वाहतुकीचा बोजवारा
अकोल्यातील प्रमुख रस्त्यांवर ऑटो रिक्षा चालकांची बेशिस्त गर्दी आता असह्य झाली आहे. गांधी चौक, बसस्टँड, रेल्वे स्टेशन, जुने शहर, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, कौलखेड आणि टिळक रोड परिसरात या चालकांनी रस्तेच अडवले आहेत. ही रिक्षा कुठेही थांबवली जाते, ना सिग्नल पाहिला जातो, ना वाहतुकीचे नियम पाळले जातात.
वाहतूक पोलीस काही ठिकाणी उपस्थित असले तरी त्यांचा सहभाग ‘बघ्याची भूमिका’ यापलिकडे जात नाही, असा आरोप नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे सिटी कोतवाली ते गांधी चौक हा एकतर्फी मार्ग असतानाही रिक्षाचालक या रस्त्यावर सर्रास उलटी वाहतूक करतात.
कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर RTO कधी कारवाई करणार?
अकोल्यातील आरटीओ विभाग केवळ नावालाच उरला असल्याची टीका आता नागरिक थेट समाजमाध्यमांतून करत आहेत. रिक्षाचालकांकडे चालक-वाहक परवाना, विमा, नोंदणी प्रमाणपत्र, प्रदूषण प्रमाणपत्र आणि ड्रेस कोड असणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.
अनेक वेळा प्रवाशांकडून १० रुपयांच्या भाड्यासाठी वाद निर्माण होतो, व त्यातूनच रस्त्यावरच भांडण सुरू होते. यामुळे इतर वाहनचालकांचे तसेच पादचाऱ्यांचे प्राण धोक्यात येतात. वाहतूक पोलिसांनी याप्रकरणी शिस्तबद्ध प्रणाली तयार करावी आणि निर्दिष्ट जागी रिक्षा थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिक त्रस्त, प्रशासन मौन – जबाबदारी कुणाची?
अकोल्यातील वाहतुकीची समस्या ही नव्याने उद्भवलेली नसून, अनेक वर्षांपासून नागरिक त्याचा सामना करत आहेत. पण सध्या रिक्षाचालकांची बेशिस्त वृत्ती आणि प्रशासनाचा ढिसाळपणा यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. काही चालक तर रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून प्रवासी शोधत बसतात.
त्यातच कागदपत्रे नसलेल्या वाहनांची संख्या वाढल्याने सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेची नितांत गरज आहे. कायद्याचा बडगा दाखवण्याची वेळ आता आली आहे.
निष्क्रिय प्रशासनावर टीका, नागरिकांकडून कारवाईची मागणी
सध्याच्या परिस्थितीत नागरिकांची मागणी आहे की –
वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी
रिक्षा थांबवण्याच्या ठिकाणी स्पष्ट सूचना द्याव्यात
बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी
आरटीओने चालकांच्या कागदपत्रांची तपासणी नियमित करावी
अकोल्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाने आता जागं होणं अत्यावश्यक आहे. अन्यथा शहरातील वाहतूक हीट मॅप्समध्ये ‘हाय रिस्क’ झोनमध्ये गणली जाईल.
आपल्या परिसरातील वाहतूक समस्यांविषयी तुम्हाला काही सूचना किंवा तक्रारी असल्यास, खाली कमेंट करून आपला आवाज पोहोचवा. अशीच आणखी माहितीपूर्ण बातम्या वाचण्यासाठी आमच्या पोर्टलला नियमित भेट द्या.