अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २६ जून २०२५ :- अकोला शहरात राजराजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्जावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी आमदार साजिद पठाण यांच्यावर टीकेची झोड उठवत प्रश्न केला की, जे अग्रसेन चौकातील खड्डा बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी निधी काय आणणार? यामध्ये निधी, प्रस्ताव, मागील प्रयत्न आणि राजकीय प्रतिक्रियांचा समावेश असून हा विषय अकोल्यात चर्चेचा बनला आहे.
राजेश्वर मंदिराच्या दर्जावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
अकोल्याचे श्रद्धास्थान असलेल्या राजराजेश्वर मंदिराच्या दर्जावरून सध्या अकोल्यात जोरदार राजकीय चर्चा सुरु आहे. पश्चिम अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांनी अलीकडेच मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून दिल्याचा दावा करत पत्रकार परिषद घेतली. परंतु, त्यांच्या या दाव्यावर भाजपाच्या प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी गंभीर सवाल उपस्थित करत पठाण यांच्यावर थेट स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा आरोप केला आहे.

गिरीश जोशी यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, “प्रसारमाध्यमात स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यासाठी वीस लाखांची जागा खर्च करणारे पठाण साधा अग्रसेन चौकातील खड्डा बुजवू शकले नाहीत, ते राजराजेश्वर मंदिरासाठी निधी काय आणणार?”
सावरकरांचा सततचा पाठपुरावा आणि निधी मंजुरीचा इतिहास
गिरीश जोशी पुढे म्हणतात की, गेल्या दोन वर्षांत आमदार रणधीर सावरकर यांनी राजराजेश्वर मंदिराच्या दर्जासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी मंदिर विकास आराखड्यासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर करून घेतला. या निधीच्या आधारे महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती विभागीय कार्यालय, मंत्रालयातील विविध विभागांमध्ये सावरकर आणि मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सातत्याने फाईल फिरवत होते.
जोशी यांच्या म्हणण्यानुसार, हा संपूर्ण इतिहास अनेक प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी छापून पुरावा म्हणून देखील दिला आहे. त्यामुळे केवळ पत्रकार परिषद घेऊन ‘ब’ वर्ग दर्ज्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न म्हणजे जनतेची दिशाभूल आहे, असं त्यांनी ठामपणे म्हटलं.
पठाण यांचा निधी कुठून? – भाजपाचा सवाल
जोशी यांनी साजिद पठाण यांना थेट आव्हान देत विचारले आहे की, “तुम्ही कोणत्या शासकीय ‘हेड’ अंतर्गत निधी मागवला? त्यासाठी कोणते दस्तऐवज तयार केले? मागील १५ महिन्यांत या संदर्भात केलेला पत्रव्यवहार जनतेपुढे जाहीर करा.”
पुढे त्यांनी सांगितले की, “केवळ मोठ्या आवाजात आणि वाजतगाजत पत्रकार परिषद घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न म्हणजे राजकारणातली स्वस्त प्रसिद्धी आहे.” त्यांनी हेही स्मरण करून दिलं की, “पठाण यांनी लोकसभेच्या सभागृहात केलेलं ‘विवादास्पद भाषण’ आजही अकोल्यातील जनतेला आठवतंय.”
तुम्हाला काय वाटतं – राजेश्वर मंदिराच्या विकासासाठी खरं योगदान कुणाचं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नोंदवा. अश्याच राजकीय आणि सामाजिक बातम्यांसाठी www.akolanews.in ला भेट देत रहा.