अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील इराण-इस्रायल संघर्षाने जागतिक व्यापारी वातावरणात अस्थिरता निर्माण केली आहे. भारताच्या व्यापार, तेल आयात आणि निर्यात धोरणावरही त्याचे तीव्र परिणाम जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थतज्ज्ञ, निर्यातदार आणि व्यापार विश्लेषकांनी गंभीर चिंता व्यक्त केली असून, जर ही परिस्थिती अधिक चिघळली, तर भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
भारतीय कंपन्यांनी इराण, इस्रायल, इराक, जॉर्डन, सीरिया आणि येमेनसारख्या देशांमध्ये गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर निर्यात वाढवली आहे. परंतु सध्याच्या लष्करी संघर्षामुळे हे मार्ग बाधित होत असून, अनेक ऑर्डर्स थांबवाव्या लागल्या आहेत.
‘टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया’चे संस्थापक अध्यक्ष शरद कुमार सराफ म्हणाले, “या युद्धामुळे आपण एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. भारताचा पश्चिम आशियाशी असलेला घनिष्ठ व्यापार मोठ्या अडचणीत सापडेल.” सराफ यांच्या कंपनीचा व्यापार नायलॉन, प्लास्टिक प्लग्स, क्लॅम्प्स आणि कॅप्सिल क्लोजरच्या उत्पादनावर आधारित आहे, जो मोठ्या प्रमाणावर पश्चिम आशियात जातो.
एका अन्य निर्यातदाराने सांगितले की, लाल समुद्रात येमेन-समर्थित हुथी बंडखोरांकडून व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले आणि होर्मुझच्या खाडीत निर्माण झालेली तणावाची परिस्थिती यामुळे मालवाहतुकीला पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत. सध्या अनेक व्यापारी आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’ मार्गाचा वापर करत आहेत, पण यामुळे वाहतूक खर्चात आणि वेळेत प्रचंड वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अशा अनिश्चिततेच्या काळात भारताने तातडीने धोरणात्मक पावले उचलली आहेत. जागतिक व्यापार विश्लेषण कंपनी ‘केप्लर’ने दिलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, भारताने जून महिन्यात रशियन तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. सौदी अरेबिया, इराक, यूएई आणि कुवेत या पारंपरिक पुरवठादारांकडून जेवढं तेल आयात केलं जातं, त्यापेक्षा रशियन खरेदी अधिक झाली आहे.
भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांनी जूनमध्ये दररोज २ ते २.२ दशलक्ष बॅरल रशियन कच्चं तेल खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत — जे गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. हे पाऊल भारताने अत्यंत चातुर्याने उचलले असले तरी, लवकरच इतर देशही पर्यायी पुरवठादार शोधण्याच्या प्रक्रियेत उतरले, तर स्पर्धा आणि किंमती या दोन्ही वाढण्याची शक्यता आहे.
या परिस्थितीत सर्वसामान्य भारतीयांसाठी महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल दर, आयात वस्तूंच्या किमती, आणि सर्वसामान्य जीवनावश्यक वस्तूंवर याचा अप्रत्यक्ष परिणाम जाणवू शकतो. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आर्थिक फटका केवळ व्यापाऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो अखेर सर्वसामान्यांच्या खिशाला लागतोच.
भारतातील निर्यातदार, व्यापारी व अर्थविश्लेषक सध्या घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. आशा आहे की परिस्थिती लवकरच निवळेल, पण त्याआधी धोरणात्मक तयारी आवश्यक ठरणार आहे.