अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ७ जून २०२५ :- अकोला जिल्ह्यातील शनिवार काळाचा ठरला! बार्शी टाकळी तालुक्यात दोन युवकांचे धरणात बुडून मृत्यू, तर अकोट तालुक्यात आत्महत्येची घटना. जीव धोक्यात घालून पिंजरच्या आपत्कालीन पथकाने शोधले मृतदेह. सविस्तर बातमी वाचा.
धरणांमध्ये मृत्यूच्या छायेत अकोला जिल्हा: एकाच दिवशी तिन्ही मृत्यू
शनिवारी, ७ जून २०२५, अकोला जिल्ह्यात मृत्यूचा थरकाप उडवणारा काळ ठरला. जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या धरणांमध्ये एकाच दिवशी तिघांचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये दोन युवक अपघाताने बुडाले असून एकाने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. या गंभीर घटनांनी जिल्ह्यात शोककळा पसरवली आहे.
बार्शीटाकळीमध्ये दुर्दैवी अपघात, दोघांचा बुडून मृत्यू
पहिली घटना बार्शी टाकळी तालुक्यातील बोरमळी धरणात घडली. येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. युवकांचे मृतदेह सर्च ऑपरेशननंतर शोधण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी ही बातमी अकोला न्यूज नेटवर्ककडे दिल्यानंतर ती काही तासांतच जिल्हाभर चर्चेचा विषय बनली. या घटनेच्या धक्क्यातून जिल्हा सावरतो न सावरतो, तोच दुसरी घटना समोर आली.
वान धरणात आत्महत्या; ३० वर्षीय युवकाने घेतला जीवनास विराम
दुसरी धक्कादायक घटना अकोट तालुक्यातील वान धरणात घडली. दानापूर येथील जितेंद्र मनमोहन राठी (वय ३०) या युवकाची मोटारसायकल धरणाच्या भिंतीवर आढळून आली, तर जवळच पाण्यात चप्पल तरंगताना आढळली. त्यामुळे आत्महत्येची शक्यता वर्तवण्यात आली. सुरुवातीला स्थानिक बचाव पथकाने शोधमोहीम राबवली, मात्र स्पॉट लोकेशन न मिळाल्यामुळे अडचणी आल्या.
या परिस्थितीत पिंजर येथील “मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन” संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. टीमचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धरणाच्या खोल पाण्यात मृतदेह शोधण्याचे आव्हान पेलले.
80 फूट खोल मृतदेहाचा शोध; अकोल्याच्या जवानांची पराकाष्ठा
घटनास्थळी सायंकाळी ८ वाजता पोहचलेल्या पथकाने तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू केले. मात्र धरणाचे खोल पाणी (कुठे ७० तर कुठे ८० फूट), कपारी आणि अंधारामुळे शोध मोहीमेस अडथळे येत होते. तरीही जिद्दीने ऑपरेशन सुरूच ठेवले गेले. अखेर रात्री ११:३० वाजता, ८० फूट खोल पाण्यातून मृतदेह रॅम्प यु किटच्या सहाय्याने शोधून वर काढण्यात आला.
टीममध्ये दीपक सदाफळे यांच्यासह मयूर सळेदार, शेखर केवट, अंकुश सदाफळे, विष्णु केवट, किशोर तायडे, शिवम वानखेडे आणि सार्थक वानखेडे या जवानांचा समावेश होता.
घटनास्थळी पोलीस व प्रशासनाची तत्परता
घटनास्थळी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड, पो.कॉ. प्रमोद चव्हाण, पो.हे.कॉ. इंगळे, तसेच पोलीस कर्मचारी हजर होते. याशिवाय तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी ओमप्रकाश वेरुळकर, तलाठी अंकुश मानकर, पोलीस पाटील संतोष माकोडे यांच्यासह नातेवाईकांची गर्दी होती. तेल्हारा तहसीलदार सोनावणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे हे घटनास्थळी सतत संपर्कात होते.
मृत्यूसमोर उभे राहिले ते शोध पथकाचे जवान
ही घटना दुर्दैवी असली, तरी पिंजरच्या जवानांनी दाखवलेले शौर्य आणि तत्परता खर्या अर्थाने कौतुकास्पद आहे. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी मृतदेह सापडत नाही तोपर्यंत ऑपरेशन थांबवले नाही. ही त्यांची शोध मोहीम म्हणजे केवळ कामगिरी नव्हे, तर माणुसकीचा सर्वोच्च आदर्श होता.
तुमचं मत, तुमच्या अडचणी आता सर्वांपर्यंत पोहोचतील !
तुमच्या आसपासची कोणतीही घटना, समस्या, तक्रार, बातमी, अडचण, किंवा सामाजिक प्रश्न तुमच्याकडे असल्यास आम्हाला पूर्ण माहिती आणि फोटो/व्हिडीओसह
👉 https://tinyurl.com/3mb7zrjj 👈 या लिंक वर क्लिक करून पाठवा. आमचं न्यूज चॅनल तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवेल !
[कॉपीराईट © 2025 | ANN Akola News Network]