WhatsApp


शेतकऱ्याच्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर, अवघ्या चार वर्षांच्या तुषारचा नदीत बुडून मृत्यू, आगर गावात हळहळ

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १९ मे :- अकोला जिल्ह्यातील आगर गावात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संशयास्पद घटना घडली असून, संपूर्ण गाव शोकमग्न झाला आहे. गावातील रहिवासी आणि शेतकरी भूषण गव्हाळे यांच्या कुटुंबावर काळाने पुन्हा एकदा घाला घातला आहे. गेल्यावर्षी त्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, आज पुन्हा त्यांच्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आज सकाळी आठच्या सुमारास तुषार गव्हाळे हा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र बराच वेळ उलटूनही तो परत न आल्यामुळे भूषण गव्हाळे आणि त्यांच्या पत्नीने शोधाशोध सुरू केली. परिसरातील गावकरीही तुषारचा शोध घेण्यासाठी पुढे सरसावले. अखेर संध्याकाळी सहाच्या सुमारास गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीपात्रात तुषारचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही दृश्य पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले आणि वातावरण शोकाकुल झाले.

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून तुषारचा मृतदेह अकोल्याच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, तुषारला बैलजोडीचे विशेष आकर्षण होते. गावकऱ्यांच्या मते, कदाचित तो बैलांच्या मागेच नदीपात्राच्या दिशेने गेला असावा आणि तिथे अपघाताने पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला असावा.

परंतु या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघ्या चार वर्षांचा मुलगा दोन किलोमीटर अंतरावरील नदीपात्रापर्यंत कसा पोहोचला? वाटेत कोणीही त्याला पाहिले नाही का? त्याचा मृत्यू खरंच अपघाताने झाला की इतर काही कारण होते? या सर्व बाबींचा तपास उरळी पोलीस स्टेशनमार्फत सुरू असून, सत्य तपासाअंतीच समोर येईल.

भूषण गव्हाळे हे आपल्या कुटुंबासोबत साध्या आणि शांत जीवनात जगत होते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी दुःखावर मात करत पुन्हा संसाराची घडी बसवली होती. परंतु नियतीने त्यांच्या आयुष्यात पुन्हा दुःखाची छाया पसरवली आहे. तुषारच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, गव्हाळे कुटुंबावर सहानुभूतीचा वर्षाव होत आहे.

या दुर्दैवी घटनेने गावातील प्रत्येकाचे मन हेलावले आहे. एक निष्पाप चिमुकला, जो फक्त खेळण्याच्या उद्देशाने बाहेर गेला होता, असा काळाच्या पडद्याआड जाईल, याची कोणालाही कल्पना नव्हती. तुषारच्या अकाली जाण्याने गावातल्या प्रत्येकाने डोळ्यात अश्रू दाटले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!