अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ११एप्रिल २०२५:- भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. देशातील रेल्वे स्थानकांच्या सुधारणा आणि प्रवाशांना आधुनिक सोयी-सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने राबवली जाणारी ही योजना महाराष्ट्रासाठी मोठा मैलाचा दगड ठरणार आहे. शेगाव आणि मुर्तीजापूर स्थानकांचाही यात समावेश करण्यात आला असून, यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री यांचे आभार मानले.
अमृत भारत स्टेशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून, तिच्यामार्फत देशातील 1300 हून अधिक रेल्वे स्थानकांचे पुनर्विकास आणि आधुनिकीकरण केले जाणार आहे. या योजनेत स्थानकांच्या सौंदर्यीकरणाबरोबरच प्रवाशांच्या सुविधांमध्येही लक्षणीय वाढ केली जाणार आहे. यामध्ये वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट, स्वच्छतागृहे, लिफ्ट, एस्केलेटर्स, डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स, फ्री Wi-Fi अशा विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

या योजनेअंतर्गत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सर्वाधिक 1813 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय नागपूर (589 कोटी), पुणे, नाशिक रोड, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), सोलापूर, अमरावती, सातारा, सांगली, परभणी, भुसावळ, इत्यादी महत्त्वाच्या स्थानकांचाही यात समावेश आहे.
विदर्भ आणि मराठवाडा विभागासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. मुर्तीजापूर स्थानकासाठी १३ कोटी रुपये, शेगावसाठी २९ कोटी रुपये आणि बडनेऱ्यासाठी ३६.३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या योजनेची एक महत्त्वाची बाब म्हणजे फक्त प्रमुख शहरांतीलच नव्हे तर उपनगरीय व ग्रामीण भागांतील स्थानकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. जसे की – अकलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड, आकुर्डी, देहू रोड, तळेगाव, कुर्ला, कांजुरमार्ग, विक्रोळी, जोगेश्वरी, परळ, प्रभादेवी, वडाळा इत्यादी.
या स्थानकांसाठी कोटींच्या घरात निधी मंजूर झाला आहे, ज्यात स्थानिक प्रवाशांना आता अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
अमरावती विभागातील विकास
अमरावती विभागातील बडनेरा, शेगाव, मुर्तीजापूर, धामणगाव, वाशिम, मलकापूर, नांदुरा, चांदा फोर्ट, गोंदिया, बल्लारशाह, चंद्रपूर, हिंगणघाट, पुलगाव, सेवाग्राम, काटोल, कामठी, नरखेड यांसारख्या स्थानकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. हे सर्व स्थानक स्थानिक दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांच्या विकासाचा निर्णय हा राज्यातील प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा आहे. शेगाव आणि मुर्तीजापूरसारख्या ग्रामीण भागातील स्थानकांना यामध्ये स्थान दिले जाणे हे सर्वसमावेशक विकासाचे द्योतक आहे. हा निर्णय निश्चितच महाराष्ट्राला प्रगत दळणवळण व्यवस्थेकडे घेऊन जाणारा ठरणार आहे.
