अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ११ मार्च २०२५:-भारतीय कापूस निगम (CCI) ने चालू कापूस हंगाम 2024-25 अंतर्गत किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेखाली कापूस खरेदी सुरू केली आहे. कापूस विक्रीसाठी इच्छुक शेतकऱ्यांना १५ मार्च २०२५ पूर्वी नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना हमी दराने कापूस विक्री करता येणार नाही, अशी स्पष्ट सूचना CCI ने दिली आहे.
जिल्ह्यात ११ केंद्रांवर नोंदणी सुरू
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बोरगाव मंजू, कापशी, निंबी, अकोट, चोहोट्टा बाजार, तेल्हारा, हिवरखेड, पारस, बार्शिटाकळी, महान आणि मूर्तिजापूर या ११ ठिकाणी नोंदणी केंद्रे उघडण्यात आली आहेत.
हमी दराने कापूस विक्री का फायदेशीर?
कापूस दर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतो, त्यामुळे हमी दर शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य प्रदान करतो. चालू हंगामात हमी दराने विक्री केल्यास बाजारभावापेक्षा अधिक सुरक्षित दर मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारच्या या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
सीसीआयने जाहीर केल्यानुसार, चालू हंगाम ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपणार आहे. त्यामुळे वेळेत नोंदणी करून कापूस विक्रीची प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांनी त्वरित पावले उचलावी
किमान हमी दराचा फायदा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ मार्चपूर्वी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीशिवाय हमी दर मिळणार नाही, त्यामुळे वेळ न घालवता लवकरात लवकर नोंदणी करा आणि सरकारच्या योजनेचा लाभ घ्या.
शेतकरी बांधवांनी ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा.