छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अत्यंत खालच्या पातळीवरील पोस्ट केल्याने संवेदनशील चिखली शहरात शुक्रवारी संध्याकाळी सामाजिक तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सकल हिंदू समाजातील युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिवभक्तांनी थेट चिखली पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार भूषण गावंडे यांची भेट घेत संबंधित युवकांविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनात मलिक अश्पाक व त्याच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियावरून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद व समाजभावना दुखावणारी विधाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, अशा प्रकारच्या पोस्टमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, समाजात जातीय तेढ निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांची तात्काळ अटक करून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणामागील सूत्रधार कोण आहे, कोणाच्या चिथावणीवरून हे कृत्य करण्यात आले, याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकारामागे केवळ व्यक्ती नव्हे तर सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट असण्याची शक्यता व्यक्त करत, आरोपींवर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.
या संपूर्ण घटनेदरम्यान चिखली पोलीस प्रशासन सतर्क असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, दोषींवर कधी आणि किती कठोर कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





