राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका राज्यासाठी एक उत्सव ठरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
कशा होतील निवडणुका?
चार वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा, टप्पे आणि इतर तपशील जाहीर करण्यात आले. निवडणुका ईव्हीएमद्वारे होतील. ओबीसी आरक्षण आणि मतदारयादी सुधारणांवरही स्पष्टता येईल. राज्यातील राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून, स्थानिक मुद्द्यांवरून जोरदार सामना रंगणार आहे.
कधी होतील निवडणुका? तारीख काय?
२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मतदारसंघनिहाय ७ नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मोबाईल अॅपमधून आपले नाव तपासू शकता. मतदारांना उमेदवारांची माहिती देखील मिळणार आहे.
दुबार मतदार संदर्भात आयोगाने दक्षता घेतली आहे. दुबार मतदाराच्या नावापुढे स्टार असणार आहे. अधिकारी त्यांची चौकशी करतील. अन्यत्र मतदान करणार नाही, याची हमी घेतली जाईल, असे आयोगाने सांगितले. दुबार मतदारांची वेगळी यादी असणार आहे.
अर्ज दाखल करण्याची तारीख १० नोव्हेंबर आहे. तर अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर आहे. मतदान २ डिसेंबर रोजी होईल, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होऊन निकालही त्याच दिवशी जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
        
			
        
        
        




