WhatsApp

“फराळात गोडवा, पण हेतू कडू!”दिवाळीचा बहाणा; स्नेहमिलनांच्या नावाखाली राजकीय गोड बोलणी सुरू — अकोल्यात रंगली मतदार मोहिनीची शर्यत!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी | 3 नोव्हेंबर 2025 अकोला जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोक्यावर येऊन ठेपल्या आहेत. आचारसंहितेची चाहूल लागल्याने सर्वच पक्षांनी सध्या मतदारांच्या दाराशी गोडवा घेऊन पोहोचण्याची धावपळ सुरू केली आहे. दिवाळीच्या सणाचा बहाणा साधत “स्नेहमिलन” या नावाखाली राजकारणाचा नवा खेळ रंगलाय.



गेल्या काही दिवसांत अकोट, एका नावाजलेल्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये नेत्यांच्या घरासमोर फराळाचे ताट, मिठाईचा सुवास आणि “आपला माणूस” म्हणणाऱ्या हसऱ्या चेहऱ्यांचा ओघ सुरू आहे. ज्यांच्या घरी पाच वर्षांत कोणी विचारायला आलं नाही, तेच आता “सर्व मतदार बांधवांसाठी स्नेहमिलन सोहळा” आयोजित करत आहेत.

फराळाच्या ताटात ‘आम्हाला एकदा संधी द्या’चा गोडवा!

चकल्या, लाडू, अनारसे यांच्यासोबत प्रत्येक ताटात एक वाक्य वाढलंय — “या वेळी आमचं ऐका, आम्हाला एकदा संधी द्या.” राजकारणाची ही चव मतदारांना नवीन नाही. “सण आला की आठवण होते, निवडणूक गेली की विसर पडतो,” असं शहरातील नागरिकांचं स्पष्ट मत आहे.

Watch Ad

अकोल्याच्या प्रत्येक वळणावर आता एकच दृश्य — स्नेहमिलनाचा बॅनर, फुलांची आरास, दिव्यांची सजावट आणि सोशल मीडियावर ‘लाईव्ह’ कार्यक्रम. दिवाळीच्या प्रकाशात राजकीय दिव्यांची झगमग वाढली आहे. मतदारांच्या हृदयात प्रवेश करण्यासाठी सर्वच पक्ष आपली “लाईक आणि शेअर” मोहीम जोरात राबवत आहेत.

सौजन्याचा मुखवटा की मतांचा हिशोब?

सत्ताधारी पक्ष विकासाच्या भाषणांनी आपला रिपोर्ट कार्ड दाखवतोय, तर विरोधी पक्ष ‘आम्हीच खरा पर्याय’ म्हणत दार ठोठावतोय. सणाच्या मृदू वातावरणात मतदारांना गाठण्याचा हा काळ नेत्यांसाठी सोन्याची संधी ठरतोय. मात्र नागरिक विचारतात — “हा स्नेह खरा की निवडणुकीचा मुखवटा?”

सेल्फी फ्रेम, लाईव्ह प्रचार आणि आश्वासनांचा धूर

फराळाच्या कार्यक्रमातून आता राजकीय ‘लाईव्ह’ सुरू आहेत. प्रत्येक भेटीत फोटो, प्रत्येक फोटोसोबत हॅशटॅग — #विकासाचाप्रतिबंध, #जनतेचेनाते. दिव्यांच्या उजेडात आश्वासनांचा धूर मात्र गडद होताना दिसतोय.

फराळ संपला की वचन विसरतात!” — मतदारांचा संताप

एका वृद्ध मतदाराने सांगितले, “गेल्या पाच वर्षांत रस्ता खड्ड्यात, पाणी नळात नाही, पण आता फराळासह भेटायला येतात. गोडवा तोंडात, पण हेतू कडू आहे.” या शब्दांत अनेकांच्या मनातील नाराजी दडली आहे.

निवडणुकीची पायाभरणी सुरू

आचारसंहितेपूर्वीच पक्षांनी स्नेहमिलन, भेट कार्यक्रम, आणि सोशल मीडिया मोहिमेद्वारे आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज केले आहे. अजून निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला नसला तरी वातावरण तापलं आहे.

दिवाळीचा उत्सव की निवडणुकीचा पहिला टप्पा?

दिवाळीच्या दिव्यांपेक्षा आता आश्वासनांचा उजेड अधिक झगमगतोय. प्रत्येक घरात आरास आहे, पण नेत्यांच्या मनात निवडणुकीचा दिवा पेटलाय.
अकोल्यातील नागरिक सध्या या “गोड” राजकारणाचे साक्षीदार आहेत. पुढील काही दिवसांत कोणाचं समीकरण जुळतं आणि कोणाचं बिघडतं, हेच ठरवेल —
फराळाचा गोडवा टिकतो की मतदारांचा कटू अनुभव पुन्हा ताजातवाना होतो!

Leave a Comment

error: Content is protected !!