WhatsApp

स्वातंत्र्य दिनापूर्वी बॉम्बस्फोटाचा कट उधळला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचे ६ गुन्हेगार अटकेत

Share

अकोला न्यूज नेटवर्क
जयपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली आणि ग्वाल्हेरमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा मोठा कट राजस्थान पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने तीन अल्पवयीन मुलांसह टोळीच्या सहा सदस्यांना अटक केली आहे. कॅनडात बसलेला आणि मुंबईतील बाबा सिद्दीकी खून प्रकरणाचा सूत्रधार जीशान अख्तर याच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे स्वातंत्र्यदिनादिवशी होणारा मोठा घातपात टळला आहे.



पंजाबमधून फरार होऊन राजस्थानात लपले
अटक करण्यात आलेले हे सहा गुन्हेगार ७ जुलै रोजी पंजाबच्या शहीद भगतसिंग नगरमध्ये ग्रेनेड हल्ला करून फरार झाले होते. त्यानंतर ते राजस्थानमधील जयपूर आणि टोंक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. राजस्थान पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर पुढील तपासासाठी पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

दिल्ली आणि ग्वाल्हेरमध्ये बॉम्बस्फोटाची योजना
पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी दिल्ली आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची या गुन्हेगारांची योजना होती. जर राजस्थान पोलिसांनी वेळेवर कारवाई केली नसती, तर स्वातंत्र्यदिनी मोठा घातपात झाला असता. या कटाचा सूत्रधार कॅनडात राहणारा जीशान अख्तर असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या गुन्हेगारांशी संपर्कात होता आणि त्यांना सूचना देत होता. पंजाबमधील हल्ल्यासाठी ग्रेनेडही त्यानेच पुरवला होता.

पाकिस्तानी गुन्हेगारांशीही संबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडातून कारवाया चालवणारा जीशान अख्तर याचे पाकिस्तानी गुन्हेगार शहजाद भट्टी आणि मनू अगवान यांच्यासोबतही संबंध आहेत. हे गुन्हेगार पंजाबच्या गोपी नवा शहरियाच्या टोळीसोबत मिळून, देशातील बेरोजगार तरुणांना पैशाचे आमिष दाखवून गुन्हेगारी कारवायांसाठी वापरत होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सोनू उर्फ काली, जितेंद्र चौधरी आणि संजय या तीन सज्ञान आरोपींसह तीन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.

Watch Ad

Leave a Comment

error: Content is protected !!