WhatsApp

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवला

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा पुन्हा एकदा वापर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी करण्यात आला असून, यामुळे या विभागाच्या योजनांवर गंडा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने ३१ जुलै रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, तब्बल ४१०.३० कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून वळवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाच्या काही तासांपूर्वीच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली होती.



विरोध असूनही निधी वळवला
मागील वेळीच शिरसाट यांनी उघडपणे संताप व्यक्त करत या योजनेसाठी सामाजिक विभागाचा निधी वळवण्यावर आक्षेप घेतला होता. मात्र यंदाही त्यांचा विरोध डावलून अजित पवार यांच्या अर्थखात्याने पुन्हा तोच मार्ग अवलंबल्याचे दिसते. यामुळे शिरसाट आता अधिक आक्रमक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी ३,००० रुपये बहिणींच्या खात्यात?
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचा प्रत्येकी १,५०० रुपयांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे. यामुळे एकाचवेळी ३,००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. या गिफ्टसाठीच सरकारने तातडीने निधी उभारण्याची गरज भासल्याने सामाजिक न्याय विभागाला पुन्हा बळी द्यावा लागला आहे.

मागील घटनांचा पुनरावृत्ती
गेल्या वेळेसही सामाजिक न्याय विभागासह आदिवासी विभागाचा एकूण १,८२७ कोटी रुपयांचा निधी महिलावर्गासाठी वळवण्यात आला होता. त्यावेळी अनुसूचित जातींसाठीच्या योजनांवर त्याचा थेट परिणाम झाला होता. आता पुन्हा ४१०.३० कोटींचा निधी गेला आहे, यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या कार्यक्रमांवर परिणाम होणार हे निश्चित मानले जात आहे.

शिरसाट पुन्हा आक्रमक होणार?
गेल्यावेळी निधीवळतीनंतर शिरसाट यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मात्र यावेळी बैठक होऊनही त्यांचा आवाज दुर्लक्षित झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शिरसाट आता केवळ विरोधापुरतेच मर्यादित राहणार की निर्णयात बदल घडवून आणतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!