WhatsApp

भाषणं खूप झाल्या, आता रोजगार द्या! राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पाटणा |
बिहारमधील तरुणांना भाषणं आणि घोषणांचा कंटाळा आला असून, त्यांना आता रोजगाराची खात्री हवी आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहार सरकारवर जोरदार टीका केली. पाटण्यात युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘महारोजगार मेळावा’त ते बोलत होते. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.



राहुल गांधी म्हणाले की, भाजपसह सत्ताधारी पक्षांनी गेल्या अनेक वर्षांत रोजगाराच्या केवळ आश्वासनांची खैरात केली; मात्र प्रत्यक्षात रोजगारनिर्मितीच्या दिशेने कोणताही ठोस प्रयत्न केला गेला नाही. या बेरोजगारीच्या लाटेमुळे लाखो तरुण बिहार सोडून परराज्यांमध्ये स्थलांतर करत आहेत. ही परिस्थिती खूपच गंभीर असून, स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे गांधी यांनी स्पष्टपणे नमूद केले.

राहुल गांधी यांच्या मते, काँग्रेस आणि इंडिया आघाडी सरकार सत्तेवर आल्यास तरुणांसाठी नवे रोजगार तयार करण्यावर सर्वाधिक भर दिला जाईल. केवळ रोजगारच नव्हे, तर कौशल्यविकास, डिजिटल शिक्षण, स्टार्टअप्ससाठी निधी आणि उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जातील. या गोष्टींचा फायदा तरुणांच्या जीवनात प्रत्यक्ष दिसून येईल, असा दावा त्यांनी केला.

महारोजगार मेळाव्यात उपस्थित तरुणांमध्ये राहुल गांधींच्या भाषणामुळे नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र होते. त्यांनी युवांमध्ये आत्मविश्वास जागवला आणि संघर्षासाठी प्रेरणा दिली. तसेच, राहुल गांधींनी बिहार सरकारने दिलेल्या ‘पाच वर्षांत एक कोटी नोकऱ्या’ या वचनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हे आश्वासन पूर्ण न होणारे असल्याची टीका केली. हा केवळ निवडणूकपूर्वीचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसच्या या उपक्रमामुळे आगामी निवडणुकीसाठी बिहारमधील तरुणवर्गाचा कल कोणत्या दिशेने झुकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment

error: Content is protected !!