WhatsApp

🛑 निष्काळजी ड्रायव्हिंगचा गंभीर परिणाम! विमा भरपाईवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
नवी दिल्ली: देशात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने निष्काळजीपणाने वाहन चालवले आणि त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना विमा कंपनीकडून भरपाई मिळणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.



हा निर्णय २ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने दिला. न्यायालयाने सांगितले की, मोटार वाहन कायद्यानुसार ‘बळी’ म्हणून त्या मृत व्यक्तीला गणले जाऊ शकत नाही, कारण तो स्वतःच्या निष्काळजी वागणुकीमुळे मृत्यूमुखी पडला आहे.


📅 काय होता प्रकरणाचा तपशील?

ही घटना १८ जून २०१४ रोजी कर्नाटक राज्यात घडली. एक फियाट लाईन गाडी अपघातग्रस्त झाली. गाडीत चालकासह त्याचे वडील, बहीण आणि भाची प्रवास करत होते. कुटुंबीयांनी दावा केला की टायर फुटल्यामुळे गाडी उलटली आणि चालकाचा मृत्यू झाला. पण पोलीस तपासात असं निष्पन्न झालं की चालकाने बेपर्वाईने आणि वेगात गाडी चालवली होती, त्यामुळे अपघात झाला.


💰 कुटुंबाचा विमा दावा काय होता?

मृत चालकाची पत्नी, पालक आणि मुलाने मिळून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीवर ८० लाख रुपयांचा भरपाई दावा दाखल केला होता. त्यांनी सांगितलं की मृत चालकाचा मासिक पगार ₹३ लाख होता आणि तो कुटुंबातील एकमेव कमावता होता. परंतु मोटार अपघात दावे न्यायाधिकरण (MACT) आणि नंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने दावा फेटाळला.


🏛️ सर्वोच्च न्यायालयाचा ठाम निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत स्पष्ट केलं की, निष्काळजीपणे चालवलेली गाडी जर स्वतःच्या मृत्यूचे कारण ठरत असेल, तर विमा कंपनीवर भरपाईची जबाबदारी लादता येणार नाही. कोर्टाने ‘निंगम्मा विरुद्ध युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी’ (2009) या पूर्वीच्या निकालाचा संदर्भ देत मत स्पष्ट केलं.


📌 न्यायालयाचे निरीक्षण

“मृत व्यक्ती अपघातासाठी स्वतः जबाबदार असल्याने त्याचे कायदेशीर वारस बळी म्हणून पात्र ठरत नाहीत. विमा संरक्षण हा बिनशर्त हक्क नाही, तर तो काही अटींवर आधारित असतो,” असं निरीक्षण पीठाने नोंदवलं.


🚨 याचा अर्थ काय?

हा निर्णय अनेक अपघात प्रकरणांमध्ये नवा दृष्टिकोन देणारा ठरतो. आजवर अपघातग्रस्तांच्या वारसांना विमा कंपन्या भरपाई देत होत्या. पण आता जर मृत व्यक्तीच निष्काळजी वागणुकीमुळे जबाबदार ठरतो, तर त्याचे वारसही भरपाईपासून वंचित राहू शकतात.


हा निर्णय रस्ते सुरक्षा आणि जबाबदार वाहन चालविण्याबाबत नवा संदेश देतो. वाहनचालकांनी वेग मर्यादा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा अपघातात जीव गमावल्यास विमा संरक्षणाचा लाभ मिळणार नाही, हे आता स्पष्ट आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!