अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नागपूर: राज्य शासनातील सगळेच मंत्री समृद्धी महामार्गाबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. परंतु या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खूद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे. त्यात बिहार, उत्तर प्रदेशांतर आता महाराष्ट्रातही या घटनेबाबत गंभीर टीका करण्यात आली आहे.
समाज माध्यमावरील ‘एक्स’वर प्रतिक पाटील या व्यक्तीने काही व्हिडिओ टाकले. सोबत पोस्ट करतांना त्याने लिहले की, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरहून नागपूरला जातांना बोगद्याचा आसपास वाहनांवर गडफेक करून लुटालूट करणे सुरू आहे. या महामार्गावर पोलीसांसह कोणतीही अत्यावश्यक सेवाही उपलब्ध नसल्याचा दावाही प्रतिप पाटील यांनी केला आहे.
दरम्यान या पद्धतीच्या घटना यापूर्वी उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांत एकायला मिळत होत्या. परंतु आता महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर या घटना घडत असल्याने त्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. या पोस्टमध्ये प्रतिकने तीन व्हिडिओ पोस्ट करत ते समृद्धी महामार्गावरील असल्याचा दावा केला आहे. दरम्यान यापूर्वीही समृद्धी महामार्गावर दगडफेक करून लुटमारीच्या घटना घडल्या आहे. त्याबाबतचे गुन्हेही संबंधित पोलीस ठाण्यात नोंदवले गेले आहे. त्यामुळे प्रतिप पाटीलच्या दाव्यानंतर या महामार्गाने प्रवास करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.
रात्रीचा प्रवास ठरतोय धोकादायक!
महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले होते. मात्र त्यानंतर समृद्धी महामार्गावरील सततच्या अपघातांची मालिका चिंतेचा विषय आहे. आता हे अपघात कमी झाले. परंतु या मार्गावरील प्रवास वाहनावरील दगडफेक व लुटीमुळे धोकादायक ठरत असल्याचा आरोप आता प्रवाश्यांकडून होऊ लागला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून नागपूरला येतांना संभाजीनगरचा बोगदा ओलांडल्यावर नागपूरकडे येतांना १२ किलोमीटरवर या घटना घडत असल्याचा दावा प्रतिक पाटील या व्यक्तीने एक्सवर केला आहे.