लखनऊ: एअर इंडियाच्या विमान अपघाताची धास्ती ताजी असताना, लखनऊच्या चौधरी चरण सिंह विमानतळावर सौदी एअरलाइन्सच्या विमानाला मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात वाचले. सौदी एअरलाइन्सच्या एसव्ही-3112 या विमानाच्या लँडिंग गियरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लँडिंगदरम्यान चाकांतून ठिणग्या उडाल्या आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले. या धक्कादायक घटनेने विमानतळावर एकच खळबळ उडाली. मात्र, पायलटच्या प्रसंगावधान आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे 250 हज प्रवाशांचा जीव वाचला.
14 जूनच्या रात्री पावणे अकरा वाजता जेद्दाह विमानतळावरून उड्डाण केलेल्या या विमानाने 15 जूनच्या पहाटे 6:30 वाजता लखनऊ विमानतळावर लँडिंग केले. लँडिंगनंतर अचानक विमानाच्या डाव्या चाकातून धूर आणि ठिणग्या बाहेर पडू लागल्या. पायलटने तात्काळ विमान थांबवून हवाई नियंत्रण कक्षाला माहिती दिली. विमानाला त्वरित टॅक्सी वे वर हलवण्यात आले आणि सर्व 250 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळाले. विमानतळावरील अग्निशमन पथकाने अवघ्या 20 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. तपासणीत हायड्रॉलिक यंत्रणेत गळती आढळून आली, जी या घटनेचे कारण ठरली. जर ही घटना उड्डाणादरम्यान घडली असती, तर मोठी दुर्घटना अटळ होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पायलटच्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दुसरीकडे, अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात घडलेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने देशाला हादरवून सोडले होते. 12 जूनला दुपारी 1:30 वाजता लंडनला जाणाऱ्या ड्रीमलायनर 787 विमानाने अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ते सरकारी रुग्णालयाच्या हॉस्टेलवर कोसळले. या भीषण अपघातात 274 जणांचा मृत्यू झाला, यात 230 प्रवासी आणि 12 कर्मचारी यांचा समावेश होता. केवळ एक प्रवासी थोडक्यात बचावला. या पार्श्वभूमीवर लखनऊच्या घटनेने पुन्हा एकदा विमान सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
सौदी एअरलाइन्सच्या या विमानाला जेद्दाहला रिकामे परत जायचे होते. पण, या घटनेनंतर विमानाची तांत्रिक तपासणी सुरू झाली आहे. पायलटच्या धाडसी निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला असून, प्रवाशांमध्येही सुटकेचा श्वास आहे.