अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिलीप जाधव प्रतिनिधी बार्शीटाकळी दिनांक ७ जून २०२५ :- तालुक्यातील बोरमळी चेलगाव धरणात बुडालेल्या चिखलगाव येथील दोन तरुणांचे मृतदेह अखेर सापडले. पिंजर येथील संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या प्रयत्नांनी 20 फूट खोल पाण्यातून दोन्ही युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतकांची ओळख योगेश डाहाळे आणि कार्तिक डाहाळे अशी झाली आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि गावकऱ्यांच्या मदतीने ही शोधमोहीम पार पडली. अधिक माहितीसाठी पूर्ण बातमी वाचा.
पिंजरच्या आपत्कालीन पथकाची तात्काळ आणि प्रभावी कारवाई
बार्शी टाकळी तालुक्यातील बोरमळी चेलगाव धरणात बुडालेल्या दोघा युवकांचे मृतदेह अखेर सापडले आहेत. 7 जून रोजी दुपारी तहसीलदार राजेश वझीरे व पुनोती विकास संघाचे प्रमुख राजू पाटील यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिखलगाव (ता. अकोला) येथील योगेश आश्रुबा डाहाळे आणि कार्तिक कृष्णा डाहाळे (वय अंदाजे 18 वर्षे) हे दोघे बोरमळी धरणात पोहण्यासाठी गेले असता बुडाले होते. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.
आपत्ती व्यवस्थापनातील संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर येथून तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासह मयूर सळेदार, शेखर केवट, अंकुश सदाफळे, विष्णू केवट, किशोर तायडे, शिवम वानखडे आणि सार्थक वानखडे या सहकाऱ्यांनी तत्काळ सर्च ऑपरेशन सुरू केले. आधुनिक उपकरणांसह सुमारे 20 फूट खोल पाण्याच्या तळाशी तपासणी करून दोन्ही युवकांचे मृतदेह शोधण्यात आले.
मृतदेह सापडताच परिसरात हळहळ; पोलीस, गावकरी घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रविण धुमाळ, पोलीस अधिकारी दीपक वारे आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे हे देखील सातत्याने संपर्कात होते. स्थानिक सरपंच, ग्रामस्थ आणि मृतकांचे नातेवाईक घटनास्थळी हजर होते.
मृतदेह सापडताच साऱ्यांमध्ये शोककळा पसरली. चिखलगावच्या दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. सुशांत आठवले (नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग – बार्शी टाकळी) यांनी दिलेल्या माहितीनुसार ही संपूर्ण मोहीम समन्वयाने पार पडली.
प्रशासनाची जबाबदारी आणि जनतेची अपेक्षा
या घटनेमुळे धरण परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि जागरूकतेच्या अभावाची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. ग्रामीण भागांतील धरण परिसरांमध्ये कोणतीही सुरक्षात्मक सूचना, पोहण्यास बंदीची फलक व्यवस्था किंवा आपत्कालीन सुविधा नसल्याने अशा घटनांना निमंत्रण मिळते. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून भविष्यातील घटनांना आळा घालण्यासाठी धोरणात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.
तुमचं मत, तुमच्या अडचणी आता सर्वांपर्यंत पोहोचतील !
तुमच्या तुमच्या आसपासची कोणतीही घटना, समस्या, तक्रार, बातमी, अडचण, किंवा सामाजिक प्रश्न तुमच्याकडे असल्यास आम्हाला पूर्ण माहिती आणि फोटो/ व्हिडीओसह
👉 https://tinyurl.com/3mb7zrjj 👈 या लिंक वर क्लिक करून पाठवा. आमचं न्यूज चॅनल तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवेल !
[कॉपीराईट © 2025 | ANN Akola News Network]