WhatsApp


Heat Strong Death:- उन्हाची झळ जीवघेणी ठरली: विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ११ एप्रिल २०२५:-राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असून, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाने चाळीशीचा टप्पा पार केला आहे. उष्णतेच्या या तीव्र लाटेमुळे अनेकांना त्रास होत असून बुलडाणा जिल्ह्यातील एक दुर्दैवी घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीतल्या १२ वर्षीय संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ही घटना केवळ दुःखद नाही, तर शासन आणि नागरिकांसाठी एक मोठा इशारादेखील आहे. वाढत्या तापमानाचा धोका केवळ वयोवृद्ध किंवा रस्त्यावरील कामगारांपुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर आता लहान मुलांवरही त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या झळा प्रचंड वाढल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याने ४२ अंश सेल्सियसचा टप्पा पार केला आहे. त्याचवेळी विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्येही तापमान ४० अंशांपेक्षा अधिक नोंदवले जात आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील नागरिक या उष्णतेमुळे त्रस्त झाले असून, विशेषतः सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत घराबाहेर पडणं धोकादायक ठरत आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि वृद्ध यांच्यावर या उन्हाचा अधिक परिणाम होताना दिसत आहे.

शेगावमधील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये शिकणारा संस्कार सोनटक्के याला शाळेत असताना कडक उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागले. त्याला त्वरीत अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एक निरागस जीव उष्माघाताच्या झळांनी हिरावला गेल्याने पालकांसह संपूर्ण शिक्षणवर्ग हादरून गेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!