युद्धाचा फटका लग्नसराईला! गॅस टंचाईमुळे लग्न समारंभांवर प्रश्नचिन्ह

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता जगभरात उमटत असून त्याचा परिणाम भारतातही जाणवू लागला आहे. महाराष्ट्रात सध्या घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची कमतरता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने सामान्य नागरिकांसह हॉटेल, खानावळ आणि केटरिंग व्यवसायिकांची मोठी अडचण झाली आहे.

विशेष म्हणजे ऐन लग्नसराईच्या हंगामात गॅस टंचाई निर्माण झाल्याने विवाह समारंभांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे परिसरात लग्न हॉल आणि केटरर्स चालवणाऱ्या व्यावसायिकांनी लाखो रुपयांच्या लग्न समारंभांच्या ऑर्डर घेतल्या आहेत. मात्र गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हजारो लोकांच्या जेवणाची व्यवस्था कशी करायची, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

हॉल व्यावसायिकांच्या मते, एलपीजी गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर ठाण्यातील सुमारे ८० टक्के हॉटेल आणि लग्न हॉल येत्या काही दिवसांत बंद पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अनेक कुटुंबांच्या विवाह सोहळ्यांवर संकट ओढवू शकते.

युद्धाचा परिणाम केवळ इंधन दरांवरच नव्हे तर हॉटेल व्यवसाय, केटरिंग सेवा आणि लग्न उद्योगावरही होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment