आज अकोला जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असतानाच भारतीय जनता पक्षमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे. माजी नगरसेवक हरीश आलीम चंदानी यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कारण चंदानी यांचा राजकीय इतिहासच भाजपसाठी अडचणीचा ठरलेला आहे.
तीन वेळा पक्षावर नाराजी व्यक्त करत भाजप सोडून गेलेले चंदानी अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीत थेट भाजपविरोधात उभे राहिले होते. त्या निवडणुकीत हरीश आलिमचंदानी यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देखील दिला होता. परिणामी भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव आजही भाजप कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरतो.
इतक्यावरच न थांबता, महानगरपालिका निवडणूक जवळ येताच हरीश आलिमचंदानी यांनी भाजपविरोधात तिसरी आघाडी उभी करून रणशिंग फुंकले होते. या आघाडीतीलच एका भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पत्नीला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्याचे सूत्रही त्यावेळी चर्चेत होते. त्यामुळे भाजपमध्ये संभ्रम, गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली होती.
अशा पार्श्वभूमीवर आज पुन्हा हरीश आलिमचंदानी याची भाजपमध्ये ‘घरवापसी’ झाली आहे. मात्र ही घरवापसी पक्षाला बळ देणारी ठरणार की निष्ठावंत कार्यकर्त्यांचा रोष वाढवणारी, हा खरा प्रश्न आहे. “पक्षासाठी राबणाऱ्यांना डावलून वारंवार पक्ष सोडून गेलेल्यांना महत्त्व दिलं जातंय,” अशी दबक्या आवाजातील नाराजी कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
भाजपला बाहेरून येणारे चेहरे हवेत की आतून निष्ठेने लढणारे कार्यकर्ते? हा सवाल आता उघडपणे उपस्थित झाला आहे. या नाराजीचा परिणाम येत्या महानगरपालिका निवडणुकीत स्पष्टपणे दिसेल का, याकडे संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागले आहे.